आज सकाळी लेक्चर संपल्यावर एका विद्यार्थ्याने विचारलेच,” मॅडम, तुम्ही बाबांचा प्रसाद घेतला नाही?”. मी फक्त हसले.आणि पुढ्च्या लेक्चरला गेले. पण यावरूनच माझ्या मनात विचारमालिका चालू झाली.मी जाणीवपूर्वक प्रसाद घेतला नाही.तिथे एका मोठ्या पातेल्यात खिचडी ठेवली होती.त्यातून एका ताटाने ती खिचडी एकजण काढायचा, दुसरा हाताने बचकभर खिचडी प्लॅस्टीकच्या द्रोणातून आलेल्यांना द्यायचा.एका मोठ्या टेबलवर खिचडीचे ताट , प्लॅस्टीकच्या द्रोण, प्यायला पाणी वगैरे ठेवले होते. आणि त्या टेबलच्या शेजारीच बहुतेकांनी खिचडी खाऊन टाकलेल्या द्रोणांचा पसारा पडला होता. एकूणच ते सगळं पाहून मला प्रसाद घ्यावासा वाटला नाही. मग मी नास्तिक आहे कां?
मी चतुर्थीचा उपवास करते.मागच्या महिन्यात आम्ही हैद्राबादला गेलो होतो तेव्हा प्रवासात असताना चतुर्थी आली होती. (२ दिवस आधीपासून माहीत होते की अमुक दिवशी चतुर्थी आहे आणि आपण प्रवासात असणार आहोत.) मी तेव्हा उपवास केला नाही. (यावेळी उपवास नको करायला असं कदाचित मनात आधीच ठरवलं होतं कां?) प्रवासात आधीच खाण्याचे हाल असतात, त्यात उपवास करून तब्येत बिघडेल असा विचार मनात होता. पण हेच जर घरी असताना चतुर्थी आहे हे लक्षात नसताना सकाळी चहा-बिस्कीट खाल्ले किंवा दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी भेळ किंवा असंच दुसरं काही खाण्यात आलं तर मात्र चुटपुट लागून रहाते. “अरे आज चतुर्थी आहे हे कसं लक्षात राहीलं नाही?”. परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोन्हींचा End Result सारखाच आहे - उपवास मोडणं.!! मग एका प्रसंगात मनाला लागत नाही आणि दुसर्या प्रसंगात मनाला टोचणी लागते की माझा उपवास मोडला. असं कां होतं? आपण आपल्या सोईप्रमाणे वागत असतो कां? वरच्या खिचडीच्या प्रसंगामध्ये मनात कुठेतरी ‘हायजीन’ चा विचार होता पण हाच विचार हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरचा चमचमीत वडापाव खाताना येत नाही. कां?
मी काही फार देवभोळी ,अस्तिक वगैरे नाही पण कठीण परिस्थिती आधार वाटतो तो देवाचाच. मनातल्या मनात गणपतीचा धावा चालू होतो. देवाचं अस्तित्व माझ्या मनात सतत असतं. त्यामुळंच प्रत्येक गोष्ट ही सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून केली जाते. मी काही चुकीचं वागले तर देवाला काय वाटेल, देव काय म्हणेल असा विचार असतो. देव रागावेल, शाप देईल असा नसतो. देवाला मी माझा मित्र, पालक मानते. एक प्रेमळ वडीलधारी व्यक्ती जिचा आदरयुक्त दरारा वाटतो पण भीती नाही वाटत. असं वाटतं की देव मला समजून घेईल पण मी त्याला गृहीत धरत नाही. घरी देवाची पूजा रोज आई करतात, पण त्या कधी बाहेरगावी गेल्या तर माझ्याकडून पूजा रोज होतेच असं नाही. एकूणच मला कर्मकांडात अडकायला आवडत नाही. पूजा-अर्चा, धूप, फुलं, अक्षता या गोष्टींनी देव प्रसन्न होतो की नाही ते माहीत नाही पण त्यामुळे माझ्या मनाला प्रसन्नता मिळते. मग ती प्रसन्नता मिळण्यासाठी मी पूजा करते. अशा बाह्य गोष्टींनी प्रसन्नता तेव्हाच मिळवावी लागते, जेव्हा मन अशांत असते. म्हणजे काय तर मी देव मानते पण तो मूर्तीतच आहे असं न मानता चांगुलपणा, माणुसकी आणि एकूणच विवेकी वागणे यात त्याचं अस्तित्व पाहते.
माझ्या चिंतनानुसार देव संकल्परूप आहे. स्वतःच्या वैयक्तिक संकल्पाच्या रूपाने तो प्रत्येकाला अनुभवता येतो. उपवास, प्रसादग्रहण ही व यासारखी अनेक कर्मकांडे या सेकल्पाला बळ मिळावे यासाठी केली जातात. पण नतर आपण ही कर्मकांडे संकल्पाला बळ देण्यासाठी करतो आहोत ही बाब विसरून गेल्याने यांत्रिकपणे करू लागून त्याची फोलपटे होतात. खरे तर संकल्पाला बळ श्रद्धा, जप, तप हेही मार्ग आहेत. पण आपण त्यांचीही फोलपटे करतो.
‘जीवनतरंग’ वर स्वागत मनोहरजी. रुढी-परंपरा पाळताना आपण process मध्येच इतके अडकतो की शेवटी हे सर्व कशासाठी हेच विसरून जातो.
आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल धन्यवाद.
शब्द न शब्द पटला….. छान लिहीलं आहेस….
तुझी संपुर्ण पोस्ट +१
धन्स तन्वी.
विचारांशी सहमत …पोस्ट आवडली …
हाभार्स
धन्यु धन्यु
वाह मस्तचं… सध्या देवाची आणि माझी कट्टी आहे. नाही तर शिर्डीला वर्षातून दोन-तीनवेळा फेरी असायचीचं. बघूया देवाच्या नशिबात माझं दर्शन कधी लिहिलंय