दिवाळीनंतर तुलसीविवाह झाला की लग्नाचे मुहूर्त चालू होतात. एव्हाना या ‘सीझन’ मध्ये ज्यांची लग्नं होणार आहेत त्यांची गडबड चालू झाली आहे-वाणसामान व इतर खरेदी, लग्नाची खरेदी, निमंत्रकांची यादी करणे, निमंत्रणे पाठवणे इ. इ. आणि ज्यांची लग्नाची ‘प्रोसेस’ चालू आहे पण अजून काही ‘फायनल’ झालं नाही, त्यांचीही वेगळीच धांदल!!
एकूणच हे सगळं पाहताना असं वाटतं की आजची पिढी खूप ‘चूझी’ झालीय. जोडीदार कोण, कसा, कुठे स्थाईक होणारा (भारतात की परदेशात) याबाबत एकदम स्पष्ट मते असणारी आहे. माझ्या लग्नाला दहा(च) वर्षे झालीयेत पण त्या दहा वर्षात लग्नाळू पिढीच्या मानसिकतेत पडलेला फरक प्रचंड आहे. (हे असं पिढी वगैरे म्हंटलं की उगाचच म्हातारं झाल्यासारखं वाटतं.) माझं ‘अरेंज्ड मॅरेज’ आहे. पण तेव्हा जोडीदार कसा असावा याबाबत फार विचार केला नव्हता. (आणि महत्वाचं म्हणजे त्याचा आता बिलकूल पश्चाताप होत नाहीय्.) सर्व जबाबदारी आई-बाबांवर दिली होती. ‘मुलाचं कर्तृत्व पाहायचं, तो किती हिंमतीचा आहे हे महत्वाचं, बाकी इतर गोष्टी दुय्यम महत्वाच्या आहेत.’ हे लक्षात ठेवून ज्या मुलाला पाहील्यावर ‘क्लीक’ झालं त्याला हो म्हंटलं आणि डोक्यावर अक्षता पडल्या. ‘पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं’ यावरच्या विश्वासाने पुढं जायचं बळ आणि शक्ती-युक्ती दिली.
नुकतंच आमच्या नात्यात एक लग्न झालं. त्यावेळी ‘वधूसंशोधनाच्या’ निमित्ताने बरेच धक्के मिळाले. आजच्या मुलींच्या किती अपेक्षा असतात.! मुलाचं दिसणं, शिक्षण, पगार, लग्नानंतर एकत्र कुटंबात राहायचं की वेगळं, कुणाचा पगार किती खर्च करायचा, नवर्यानं घरकामात मदत किती करायला हवी,हॉटेलिंग आठवड्यातून कितीदा व्हायलाच हवं अशा बर्याच गोष्टींवर ठाम मतं असतात. त्या अपेक्षा पूर्ण होईपर्यंत कितीही थांबायची तयारी असते. मुलांचंही तसंच. मुलीचं दिसणं, शिक्षण, पगार, परदेशात स्थायिक होण्याची मानसिकता आणि त्यादृष्टीने तयारी (पासपोर्ट,खाणं,पिणं,ड्रेस-सेन्स वगैरे) आहे कां, असे बरेच ‘क्रायटेरियाज्’ ठरलेले असतात. अॅडजेस्टमेंट कुणी आणि कां करायची हा महत्वाचा मुद्दा असतो. हे सगळं पाहिलं की वाटतं ‘अरे,आपण किती डोळे मिटून संसारात उडी घेतली’. एका लग्नाळू मुलीच्या आईकडून ऎकलं, “आम्ही सगळी जबाबदारी मुलीवर दिलीय्. स्वतःचं भलंबुरं कळण्याइतपत ती मोठी झालीय्. आम्ही काही ठरवलं आणि त्यातून चुकून काही वाईट झालं तर सगळं खापर आमच्यावर येणार, त्यापेक्षा तुझं तू ठरव, आम्ही तुला ‘सपोर्ट’ करू” ऎकून मी अवाक् झाले होते. एक लग्नाळू मुलगा म्हणाला, “मी आई-बाबांनी ठरवलेल्या मुलीशीच लग्न करणार. कां तर पुढं तिचं-त्यांचं पटलं नाही तर मी मध्ये येणार नाही. तुम्हीच मुलगी ठरवलीय्, तुम्हीच निस्तरा….” धक्का बसला होता हे ऎकून!!.
लग्न ही केवळ सुरवात असते. संसार हा परस्पर सहकार्य, सामंजस्य, प्रेम, विश्वास यावरच तरून जातो. सॅलरी, जॉब प्रोफाईल, टर्म्स आणि कंडीशन्स ठरवायला हा काही कंपनीतला जॉब नाही. पूर्ण आयुष्यभराशी निगडीत ही संकल्पना आहे. परस्पर सहकार्य, सामंजस्य, प्रेम, विश्वास असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितून मार्ग निघतोच. फक्त तशी मानसिक तयारी असणं आणि मनापासून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. काय चूक, काय बरोबर हा मुद्दाच नाहीय्. परिस्थितीनुसार विचारांत, अपेक्षांत बदल होत असतो. आखिर ये शादी का लड्डू है. जो खायें वो पछतायें, जो ना खायें वो भी पछतायें…..
आम्ही काही ठरवलं आणि त्यातून चुकून काही वाईट झालं तर सगळं खापर आमच्यावर येणार…….तर पुढं तिचं-त्यांचं पटलं नाही तर मी मध्ये येणार नाही. तुम्हीच मुलगी ठरवलीय्, तुम्हीच निस्तरा………….काहीजण पळवाट आगोदरच शोधून ठेवतात
हम्म……
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र… शादी. न sssss ही
अरे भैया, ये शादी का लड्डू है… मग कधी देतोयस् लाडू?